ओबामाभेटीचा फीवर आता सगऴ्यानाच चढू लागला आहे. वर्तमानपत्रात रोज कुठे कशी रंगरंगोटी सुरू आहे, मुंबईत त्यांचा मुक्काम असणा-या ताजमध्ये ताजचे स्वतःचे कर्मचारी किती असणार आणि व्हाईट हाऊसचे किती असणार, त्याच्या सुरक्षेसाठीचे सामान सात ट्रक भरून कसे पोचले, सुरक्षा अधिकारी कसे पोचले, ताजचा आजूबाजूचे परीसर मोटारींना कसा बंद केला जाणार आहे याविषयीच्या बातम्या छापून येत आहेत.
हे सर्व वाचल्यानंतर प्रश्न पडतो की अमेरिकन राष्ट्राध्यक्ष नेमके कश्याकरता येत आहेत? भारत अमेरिका सहकाराचे नवे पर्व सुरू करायला की नव्याने झेप घेत अमेरिकेशीच स्पर्धा करत असलेल्या एका राष्ट्रावर आपला रोब जमवायला. ओबामा प्रशासनाचा हेतू तरी हाच दिसतो की जगाला, विशेषतः भारतीयांना हे दाखवून देणे की तुम्ही वेगवान विकासाच्या, पाश्चिमात्य विकसीत राष्ट्रांच्या बरोबरीने उभे राहण्याच्या, महासत्ता बनण्याच्या कितीही गमज्या मारल्यात तरी त्याला काही फारसा अर्थ नाही. खरी महासत्ता ही अमेरिकाच आहे आणि लोकशाहीतील खरा सम्राट अमेरिकेचा राष्ट्राध्यक्षच आहे.
अमेरिकेने हे असे करणे स्वाभाविकच आहे. आपली ढासळती प्रतिमा राखण्याकरता त्यांना या सगळ्याची आवश्यकता आहे. प्रश्न आहे तो आपण या सगळ्याला का बळी पडावे हा. अमेरिकेने काहीही म्हटले तरी लगेचच आपण त्याला मान का डोलावतो? इतरही राष्ट्रे असेच करतात? समजा करत असली तरी भारताचे स्थान त्या सगळ्यांपेक्षा वेगळे आहे हे आपण लक्षात ठेवायला हवे. भारत हा अमेरिकेएव्हढाच मोठा देश आहे. तितकाच पुढारलेला आहे. आज अनेक अमेरिकन कंपन्या अमेरिकास्थित भारतीय य़शस्वीरीत्या चालवत आहेत आणि ते आहेत म्हणून कित्येक कंपन्या मंदीच्या काळातही तग धरू शकल्या (उदा. विक्रम पंडीत - सिटीग्रुप). असे असताना आपण अशी दुय्यम् भूमिका घेतो?
जेव्हा एखादे राष्ट्रप्रमुख दुस-या राष्ट्राला भेट देतात तेव्हा त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी मुख्यत्वेकरून त्या दुस-या राष्ट्रावर असते. फारतर राष्ट्रप्रमुखांच्या अगदी जवळ असणारे सुरक्षारक्षक त्यांचे स्वतःचे असतात. पण इथे मात्र स्थानिक पोलीसांना पूर्णपणे वेगळे ठेवले जात होते आणि त्यांनी काय काय करायचे याच्या त्यांना फक्त सूचना ओबामांच्या सुरक्षा यंत्रणेकडून दिल्या जात होत्या. ताजमध्ये तेथील लोकांनी काम करायचे नाही तर व्हाईट हाऊसचेच लोक करतील असे त्यांना सांगीतले गेले. ताजच्या मागच्या भागात मोटारी येऊ द्यायच्या नाहीत असा फतवा जारी झाला. एक बातमी तर अशी होती की अख्ख्या दक्षिण मुंबईतच दोन दिवस मोटारींवर बंदी घातली जाणार.
अर्थात या बाबतीत आपले पोलीसही काही कमी नाहीत. तेही सुरक्षेच्या नावाखाली असे निर्बंध घालतच असतात कारण असे काही केले की त्यांचे काम सोपे होते. मोटारी येण्यावरच बंदी घातली की त्या तपासत बसण्याची कटकटच नको. आणि मग कुठे काही चूक होण्याचाही प्रश्न नाही. केवळ सुरक्षा यंत्रणांच्या हातात असतं तर त्यांनी या व्हीव्हीआयपींच्या फिरण्यावरच बंदी आणली असती. त्यांना बंद किल्ल्यात वा घरात ठेवा म्हणजे प्रश्न मिटला. पण वास्तव परीस्थितीचे भान असलेल्या राजकीय पुढा-यांना असे करून चालणार नाही हे कळते. शेवटी ते लोकमतावर निवडून येत असतात आणि त्याकरता प्रसंगी धोका पत्करूनही लोकांमध्ये फिरणे, त्यांना भेटणे, त्यांच्यांशी संवाद साधणे या गोष्टी महत्वाच्या आहेत हे त्यांना समजते व ते त्या करतात.
केनेडी यांच्या हत्त्येनंतर नेमलेल्या वॉरन चौकशी आयोगाने आपल्या अहवालात या प्रश्नाचा ऊहापोह केला होता व एकूणच सुरक्षेच्या बाबतीत थोडा धोका पत्करूनही समतोल कसा साधावा लागतो याचे विवेचन केले होते. अनेकदा या समतोलाचाच आपल्याकडे अभाव दिसतो. त्यातूनच अनेक प्रश्न निर्माण होतात.
अमेरिकेच्या अध्यक्षांना जेव्हढा धोका आहे तितकाच धोका भारताच्या पंतप्रधानाही आहे. मग एक साधा प्रश्न मनात येतो जेव्हा आपले पंतप्रधान अमेरीकेत जातात तेव्हा ते जेथे रहाणार असतील त्या भागातही अशीच मोटारींवर बंदी घालण्यात येते का, तिथल्या हॉटेलमधील स्टाफला रजा देऊन आपला स्टाफच तेथे ठेवण्याचा हट्ट आपण करतो का आणि असा हट्ट त्या हॉटेलकडून चालवून घेतला जातो का. या प्रश्नांची उत्तरे नकारार्थी असतील तर मग हे सगळे लाड आपल्याकडेच का चालवून घेतले जातात. एका बाजूने आपण सुपरपॉवर होण्याच्या गोष्टी करतो आणि दुसरीकडे एका सुपरपॉवरचे हे लाड खपवून घेतो.
अमेरिकेनेही हे लक्षात घ्यायला हवे की आज ते हे सगळे हट्ट् करताहेत व ते पुरवून घेताहेत कारण त्यांच्याकडे एव्हढा खर्च करायला पैसा आहे. आज इतका पर्सनल स्टाफ आणायचा, सगळी व्यवस्था आपणच करायची या सगळ्याला प्रचंड खर्च येतो आणि अमेरिका आज तो करू शकते. पण ही अर्थिक स्थिती आणि सुपरपॉवरत्व कायमचे राहते असे नाही हे ब्रिटन आणि रशिया या दोन देशांच्या उदाहरणावरून स्पष्ट दिसते. त्यामुळे ही स्थिती केव्हाही बदलू शकते हे लक्षात घेऊनच आचरण हवे. नाहीतर एकूणातच हा सर्व समतोल राखला नाही तर अतिथी तुम कब जाओगे असे म्हणण्याची पाळी रोजच्या कामातून सुटका नसणा-या स्थानिकांवर येईल. अतिथी देवो भव म्हणणा-या व तो अतिथीधर्म पाळणा-या भारतीयांवर असे म्हणण्याची पाळी आणू नका म्हणजे झाले.
No comments:
Post a Comment